संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.३०.
भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास हा अडीच हजार वर्षांपपूर्वीचा इतिहास,क्रांत्या व प्रतिक्रांत्या यात दडला आहे.समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय या चार तत्वावर संविधान उभा आहे.या तत्त्वांची पायाभरणी अडीच हजार वर्षा पूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी केली आहे.सामाजिक,आर्थिक,राजकीय या लढ्यातून हे तत्व आकारले आहे. त्याबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक,आर्थिक क्रांतीही संविधानातून केली आहे.परंतु ज्यांच्यासाठी हा संविधान तयार झाला त्या भारतीय माणसाने हे संविधान जाणून घेतले नाही.कायद्याच्या राज्यात कायदा हेच संघर्षाला न्याय मिळवून देण्याचे साधन आहे,याची जाणीव सर्वांनी ठेवावी.संविधानाच्या पानापानातून २५०० वर्षांपूर्वीचा हा इतिहास ठासून भरला आहे.असे प्रतिपादन सुजान नागरिक मंच रायगडचे संयोजक तथा संविधान अभ्यासक नूरखाँ पठाण यांनी केले आहे.
ते भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२५ ला सुजान नागरिक मंच रायगड अंतर्गत संविधान गुणगौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय सविधान गुणगौरव परीक्षा अर्जुनी मोरगाव तालुक्यात विविध केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
येथील भागेरथीबाई आत्माराम डोंगरवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पारितोषिक वितरणाचा समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
अर्जुनीमोरगाव तालुक्यातील १० परीक्षा केंद्रावरून ६२५ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सुजान नागरिक मंच रायगडच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून या परीक्षेच्या आयोजन केले जात आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य अध्यक्ष अनिल मेश्राम हे होते.तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुजान नागरिक मंच रायगडचे मुख्य संयोजक व समितीचे मार्गदर्शक नूरखाँ पठाण हे होते.
पाहुणे म्हणून मंचावर संचालक विलास पवार, कार्याध्यक्ष माधुरीताई सपकाळ, मालाताई मेश्राम, रोहिणीताई जाधव, शबनम पठाण,विनय कुमार सोनुने, प्रा.डॉ.युवराज खोब्रागडे,किशोर चव्हाण, बी.ए.डी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पुस्तोडे,ग्राम महसूल अधिकारी भगवान नंदागवळी,नीलिमा मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण,संजीव बडोले पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रत्येक केंद्रावरून आलेल्या पहिल्या ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व पदक देऊन यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्याबरोबरच ज्यांनी २५ व त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची फी भरून व ग्रंथ देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास प्रोत्साहन केले,अशा संविधान ज्ञानदात्यांचा, त्याबरोबरच केंद्र संचालकांचा देखील स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभाला तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल नवेगावबांध, पिएमश्री जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध,बीएडी हायस्कूल नवेगावबांध, पंढरीबापू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय महागाव, सम्राट अशोक विद्यालय उमरी,बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी मोरगाव,मानवता विद्यालय बोंडगाव देवी,नवोदय विद्यालय केशोरी,पंचशील विद्यालय बाराभाटी, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी केंद्र संचालक व ज्ञानदाते समारंभाला बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संचालक विलास पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अश्विन लांजेवार यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
















Discussion about this post