देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात.
एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ फेब्रुवारी.
अर्जुनी मोर तालुक्यातील देऊळगाव बोदरा परिसरात सोनेगावच्या जंगलात दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान दोन मोटरसायकल आमोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात भंडारा जिल्ह्यातील पालांदूर चौरास नजीकच्या ढिवरखेडा येथील रहिवासी मंगेश शिवनकर (वय अंदाजे ४० वर्षे) यांचा घटनास्थळीच करूण मृत्यू झाला.दोन्ही मोटरसायकली वेगात समोरासमोर एकमेकांवर आदळल्याने,अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर गंभीर जखमी दिगंबर जयदेव मडावी (वय ३० वर्षे) आणि गजेंद्र मारोती मेश्राम (वय २७ वर्षे ) दोघेही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहूरकुडा येथील रहिवासी आहेत.दोघांनाही तातडीने जवळील ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,अर्जुनी मोरगाव ते देऊळगाव बोदरा रस्त्यावरील देऊळगाव नजीकच्या जंगल परिसरातील धोकादायक वळणावर हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.
———————
*हे ठरले देवदूत*
*माहूरकुडा येथील रहिवासी व अर्जुनी मोरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर तागडे हे याच मार्गाने दुपारी सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान बोदरा येथील फायनल शंकरपट पाहायला जात असताना,त्यांना हे अपघाताचे दृश्य दिसले.त्यांनी आपली मोटरसायकल थांबवून जखमींच्या मदतीला ते धावून गेले.त्यांनी भ्रमणध्वनी करून १०८ क्रमांकावर डायल करून ॲम्बुलन्सची व्यवस्था करून गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचते केले. जणू ते या गंभीर जखमीसाठी देवदूतच ठरले.तसेच त्यांनी पोलिसांनाही या अपघाताची माहिती दिली.हे येथे उल्लेखनीय आहे.*
——————————————
ढिवरखेडा येथील रहिवासी मंगेश शिवनकर हे आपल्या स्वगावावरुन एमएच ३६,एएच,७३६५ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून अर्जुनी मोरगावला जात होते.तर माहूरकुडा येथील रहिवासी दिगंबर मडावी आपल्या साथीदारासोबत क्रमांक नसलेल्या मोटरसायकलने देऊळगाव बोदरा येथे जात होते.
घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ढिवरखेडा गावावर शोककळा पसरली असून मृतकाच्या शिवनकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या धोकादायक वळणावर यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघात प्रवण स्थळी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
















Discussion about this post