लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’ अधिक तीव्र; १० हजार स्वाक्षऱ्यांचा टप्पा पार!
चंद्रपूरच्या अस्मितेसाठी आणि व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र येण्याचे ‘सेव्ह लोहरडोंगरी _सेव्ह ताडोबा’ मोहिमेचे आवाहन
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-पावनी-कऱ्हांडला, नवेगाव नागझिरा व गडचिरोली या ताडोबाच्या पूर्व व उत्तर दिशेकडील अतिशय महत्त्वाच्या व्याघ्र भ्रमणमार्गातील (Tiger Corridor) लोहरडोंगरी येथील प्रस्तावित लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी पुकारलेल्या मोहिमेला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘स्टॉप लोहरडोंगरी माईन : सेव्ह ताडोबा-ब्रह्मपुरी टायगर कॉरिडॉर’ या नावाने सुरू असलेल्या ऑनलाईन याचिकेने (Online Petition) १० हजार स्वाक्षऱ्यांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, चंद्रपूरसह देशभरातून याला मोठा पाठिंबा मिळत आहे.
राज्य वन्यजीव मंडळाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाघांच्या मार्गिकेतील या खाणीला मंजुरी दिली. तज्ज्ञ सदस्यांनी केलेला विरोध डावलून वाघांचा अधिवास तोडणाऱ्या या लोहखनिज खाणीला मंजुरी प्रदान करण्यात आली.
लोह खाण प्रकल्पाचे भयावह वास्तव:
• हजारो वृक्षांची कत्तल: या प्रकल्पासाठी ३५.९४ हेक्टर आरक्षित वनक्षेत्रातील तब्बल १८,०२४ झाडे तोडली जाणार आहेत.
• व्याघ्र अस्तित्वावर घाला: ब्रह्मपुरी वनविभागातील जंगल घोडझरी अभयारण्यालगत असून, येथे ६० पेक्षा अधिक वाघांचा वावर आहे. हे महत्वाचे व्याघ्र कॉरिडोर नष्ट झाल्यास व्याघ्र संवर्धनाला मोठा तडा बसेल.
• मानव-वन्यजीव संघर्ष: गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. खाण प्रकल्पामुळे जंगलाचे तुकडे झाल्याने वाघ व बिबटे मानवी वस्तीच्या अधिक जवळ येतील, परिणामी हा संघर्ष अधिक भीषण होण्याची भीती आहे.
• मागील २०१५ या एका वर्षात जिल्ह्यात मानव वन्यप्राणी संघर्षात ४७ तर यापैकी १८ मृत्यू ब्रह्मपुरी वनविभाग मधे आहे
• पर्यावरणीय संकट: खाणकामामुळे हवा आणि पाण्याचे तीव्र प्रदूषण होऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होणार आहे.
सहभागाचे आवाहन:
लोहरडोंगरीचा हा लढा केवळ पर्यावरणवादी किंवा वन्यजीव प्रेमींचा नसून, तो चंद्रपूरच्या भविष्याचा आहे. निसर्ग, जलस्त्रोत आणि भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन आपला विरोध नोंदवावा, असे आवाहन ‘सेव्ह लोहरडोंगरी _सेव्ह ताडोबा’ आणि चंद्रपूर-नागपूर येथील पर्यावरणवादी व वन्यजीव प्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.
“जिल्ह्यात आधीच कालवे, सिंचन प्रकल्प आणि रस्ते रुंदीकरणामुळे जंगलाचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे वाघांचे भ्रमणमार्ग विखंडीत झाले, त्यामुळे वाघ मानव संघर्ष वाढिस लागला आहे. मागील पाच वर्षात वाघ व इतर वन्यप्राणाच्या हल्ल्यात २०० मानवी बळी घेणाऱ्या वाघ-मानव संघर्षाला पुन्हा आमंत्रण देणे हा विकासाचा कोणता निकष आहे? सुमारे १० हजार नागरिकांनी या मोहिमेवर स्वाक्षरी करून सरकारला स्पष्ट संकेत दिला आहे की, आम्हाला खाण नको तर जंगल-निसर्ग समृद्ध हवे आहे. राज्य वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला घातलेल्या अटी ही केवळ निसर्गाची आणि संघर्षात असलेल्या या जिल्हयाची थट्टा आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
– बंडू धोतरे, माजी सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ
येथील प्रस्तावित खाण प्रकल्प हा केवळ विकासाचा मुद्दा नाही. तो येथील पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी जीवनावर थेट आघात करणारा गंभीर धोका ठरत आहे. या भागात वास्तव्यास असलेले नागरिक मानव-वन्यजीव संघर्षाचे दुष्परिणाम रोज अनुभवत आहेत. गेल्या एका वर्षातच या संघर्षात ४७ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीत खाण प्रकल्पाला परवानगी देणे म्हणजे या संकटात आणखी भर घालण्यासारखे आहे. कालवे, यांमुळे आधीच जंगलाचे तुकडे झाले सिंचन प्रकल्प, रस्ते रुंदीकरणा असून, मोठे मांसाहारी प्राणी ‘कोंडीत’ सापडले आहेत. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्षाने अलीकडच्या काळात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता पर्यावरण, निसर्ग, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून देशपातळीवरील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.













Discussion about this post