संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१६.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आज शनिवारला सकाळच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर तब्बल तीन अस्वलांनी जीवघेणा हल्ला चढविल्याने महिला गंभीरित्या जखमी झाली आहे.
रेखा दिलीप भोयर (वय ४० वर्षे), रा.बाक्टी ता.अर्जुनीमोर.असे जखमी महिलेचे नाव आहे.
तालुक्यातील अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर जखमी महिलेवर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घाटराई जंगलातील थरार.
प्राप्त माहितीनुसार,बाक्टी येथील रहिवासी रेखा भोयर आज सकाळच्या सुमारास ह्या गावातील इतर महिलांसोबत नेहमीप्रमाणे घाटराई जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता गोळा करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या तीन अस्वल त्यांच्या अंगावर धावून आल्या. आमने सामने अस्वलांना पाहताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला.एवढेच नाहीतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या जवळील झाडावर चढत असताना,आक्रमक झालेल्या अस्वलांनी त्यांना झाडावरून खाली खेचत जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यांनंतर अस्वले जंगलाच्या दिशेने पळून गेल्या.
सोबत असलेल्या महिला पुरुषांनी त्यांना जखमी अवस्थेतील रेखा भोयर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र चाना-बाक्टी येथे दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलविले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांची ही अल्पावधीत घडलेली चौथी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गस्त वाढवावी तसेच जखमी रेखा भोयर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तो पुढील उपचार करावा अन्यथा उपचाराचा खर्च द्यावा,अशी मागणी बाक्टी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.














Discussion about this post