‘पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’
प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण
आधुनिक सिंचन व्यवस्थेसह संवर्धनावर दिला जातो आहे भर
वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागपूर शहर विकसित होत असलेल्या ‘लँड स्टुड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वृक्षतोडीपूर्वीच हजारो वृक्षांचे रोपण करून त्यांच्या दीर्घकालीन संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे.
खामला ते जयताळा रोड परिसरात विकसित होत असलेल्या या प्रकल्पात फुल्लेलदेव इन्फ्रा प्रा. लि. कंपनी प्लॉट क्रमांक ३, ४ आणि ५ वर काम करीत आहे. प्लॉट क्रमांक ५ वरील बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वृक्षतोडीसाठी परवानगी १९ जून २०२३ रोजी नागपूर महानगरपालिका उद्यान विभागाकडून देण्यात आली होती. नियमानुसार या क्षेत्रात तब्बल २१५ वृक्षांचे रोपण करणे आवश्यक होते. मात्र, पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवत कंपनीने त्याहून अधिक म्हणजे तब्बल ३००० वृक्षांची लागवड केली.
या अंतर्गत तेलंगखेडी परिसरात २५०० तर वाठोडा परिसरात ५०० वृक्ष लावण्यात आले आहेत. ही वृक्षलागवड केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संवर्धन आणि निगा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वृक्षांना ड्रीप सिंचन करण्यात आले असून त्यांच्या वाढीवर आणि स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
याशिवाय प्रकल्पाच्या प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील २०५ वृक्ष हटविण्याची परवानगी कंपनीला प्राप्त झाली आहे. या वृक्षांच्या बदल्यात तब्बल ६६४८ वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत ८०६० वृक्षांचे रोपण केले असून, नियोजित वृक्षारोपणाचे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. तेलंगखेडी परिसरात सुमारे २००० वृक्षांचे रोपण पूर्ण झाले असून भोंडकी परिसरात उर्वरित वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. आतापर्यंत कंपनीने तेलंगखेडी भागात एकूण ८०८२ वृक्षांची लागवड केली आहे.
पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत या वृक्षांच्या संवर्धनासाठी बोअरवेल, ड्रिप सिंचन प्रणाली आणि सोलर पंप यांसारख्या आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. वृक्षांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
“विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ६६४८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील एकही वृक्ष तोडला जाणार नाही. भविष्यातही पर्यावरण संरक्षणासाठी आमची बांधिलकी कायम राहील,” असे कंपनीचे संचालक फुल्लेल देशमुख यांनी सांगितले.














Discussion about this post