चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर येथील आराध्य दैवत श्री महाकाली मातेची यात्रा यावर्षी २४ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. या गैरसोयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांतून हजारो भाविक महाकाली मातेच्या दर्शनासाठी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने मंदिर परिसरात आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात मंडप उभारले होते. महाकाली स्टेडियम परिसरात आणि इतर ठिकाणी सुमारे १८,००० चौरस फूट निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, तर संकुलात अतिरिक्त ३०,००० चौरस फुटांचा नवीन मंडप उभारण्यात आला होता.
मात्र सोमवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने संपूर्ण व्यवस्थेची पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले. पावसामुळे अनेक मंडपांमध्ये पाणी साचले, काही ठिकाणी तंबू फाटले, तर अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीत भाविकांच्या पूजेत खंड पडला असून झोपेचीही मोठी गैरसोय झाली. मुसळधार पावसापासून बचावासाठी भाविकांना जिथे जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका भाविक महिलेने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “लोकप्रतिनिधींचे मोठे-बडे बॅनर लावले आहेत, मात्र भाविकांसाठी उभारलेले पेंडाल फाटके आहेत. आमच्या सोयीऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे,” असा आरोप त्या महिलेने केला आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने पुरेशी दक्षता न घेतल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
या घटनेमुळे यात्रेच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असून, पुढील काळात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
*चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी*
*नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.













Discussion about this post