२०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज; कौशल्य विकास व डिजिटल कार्यबल निर्मिती अत्यावश्यक – लॉजिस्टिक्स सेक्टर स्किल कौन्सिल
Logistics Job Vacancies
नवी दिल्ली/मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२६ – भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत या क्षेत्रात १०.८ टक्के निव्वळ रोजगार वाढ नोंदवण्यात आली आहे. उद्योगाचा झपाट्याने विस्तार होत असल्यामुळे २०३० पर्यंत देशाला सुमारे ४७ लाख अतिरिक्त लॉजिस्टिक्स कर्मचाऱ्यांची गरज भासणार असल्याचे लॉजिस्टिक्स सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रविकांत यमर्थी यांनी सांगितले.
मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे सुरू झालेल्या ‘लॉजिमॅट इंडिया २०२६’ या जागतिक लॉजिस्टिक्स, मालवाहतूक आणि वाहतूक प्रदर्शनात उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. वाढत्या मालवाहतूक, वेअरहाऊसिंग, परिवहन आणि सप्लाय चेन व्यवस्थापनामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून या वाढत्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास सुधारणा आणि डिजिटल कार्यबल निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
लॉजिस्टिक्स सेक्टर स्किल कौन्सिलने लॉजिमॅट इंडियासोबत भागीदारी करून कौशल्यातील दरी कमी करण्यासाठी आणि भारताला जागतिक प्रतिभा केंद्र म्हणून उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आयोजित करण्यात आलेल्या लॉजिमॅट इंडिया २०२६ च्या तिसऱ्या आवृत्तीत १० देशांतील ३५० पेक्षा अधिक जागतिक ब्रँड सहभागी झाले आहेत. उद्योगाशी सुसंगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम व प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यबल सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.
लँडेसमेस्से स्टुटगार्ट जीएमबीएच अँड कंपनीचे उपाध्यक्ष बर्नहार्ड म्युलर यांनी सांगितले की, लॉजिमॅट इंडिया हा उद्योग, तंत्रज्ञान आणि धोरण यांचा संगम साधणारा महत्त्वाचा मंच बनला आहे. यावर्षी सात देशांतील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला गेला असून जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.
भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयातील महासंचालक व अतिरिक्त सचिव श्याम जगन्नाथन यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिलांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. “सागर पे सम्मान” या उपक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येत असून भारताच्या प्रगतीत महिलांचा सहभाग वाढणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जागतिक समुद्री कामगारांच्या संख्येत भारत पहिल्या तीन देशांमध्ये असून मनुष्यबळावर गुंतवणूक करून भारत लॉजिस्टिक्स महासत्ता बनू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉजिमॅट इंडिया २०२६ साठी अॅडव्हर्ब टेक्नॉलॉजीज, रॅक्स अँड रोलर्स, आर्मस्ट्राँग डेमॅटिक, एमएचई बाजार, जंगहिनरिक इंडिया, एसओटीआय आणि जय स्टोरेज सोल्यूशन्स यांसारख्या कंपन्यांनी भागीदारी केली आहे. तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मंडळ, वेअरहाऊसिंग असोसिएशन ऑफ इंडिया, इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांसह १५ आंतरराष्ट्रीय संघटनांचा सहभाग आहे.
या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, रोबोटिक्स, सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन आणि हरित वाहतूक यांसारख्या आधुनिक विषयांवर चर्चासत्रे, संशोधन अहवाल आणि विशेष प्रदर्शन विभाग सादर करण्यात येणार आहेत.
लॉजिस्टिक्स सेक्टर स्किल कौन्सिलची स्थापना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि भारतीय उद्योग परिसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कौशल्यातील कमतरता ओळखून प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याचे काम ही संस्था करत आहे.
















Discussion about this post